मार्केटयार्डात कचर्‍याची दुर्गंधी   

बाजार समितीचे दुर्लक्ष; व्यापार्‍यांना त्रास 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मार्केटयार्डात कचर्‍याचे ढिग पाहण्यास मिळत आहेत. या साठलेल्या कचर्‍याची दुर्गंधी सर्वत्र पसरत असल्यामुळे या दुर्गंधीचा त्रास सहन करत व्यापार करण्याची वेळ व्यापार्‍यांवर आली आहे. कचर्‍याबाबत वारंवार बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रशासन कचर्‍याकडे दुर्लंक्ष करत असल्याचे वास्तव आहे. 
 
पावसाळ्यात कचरा साठल्यास त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरत असते. मात्र मार्केटयार्डात ऐन पावसाच्या दिवसांत कचर्‍याचे ढिग साचत आहेत. मार्केटयार्डातील वेगवेगळ्या विभागात खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची संख्या मोठी आहे. तसेच पुणे विभागासह राज्य आणि देशभरातून बाजारात विविध प्रकारच्या मालाची आवक होते. त्यामुळे माल घेऊन येणारे, ग्राहक आणि व्यापारी या सर्व घटकांना या कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि जागोजागी कचर्‍याचे ढिग साठल्याने भूसार आणि फळबाजारात दुर्गधी पसरली आहे. यामुळे बाजारात येणार्‍या शेतकरी, व्यापार्‍यांना व ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात सतती होणाऱी वाहतूक कोंडीमुळे व्यापारी, कामगार, खरेदीदार वैतागले आहेत.
 
मार्केटयार्डात दररोज २५ ते ३० हजार लोकांची ये-जा असते. पुणे बाजार समिती आशिया खंडातील दुसर्‍या क्रमाकांची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. तसेच वर्षाला ३५ ते ४० कोटी रुपयांचा सेस जमा होतो. तरीही बाजार समिती सुविधा पुरवत नसल्याने व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने कचर्‍याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापारी करत आहेत. याबाबत बाजार समिती आरोग्य प्रमुख राजेद्र घुले यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
 
पावसाळ्यात बाजार आवारात स्वच्छा ठेवणे गरजेचे आहे. गूळ भूसार बाजारासह गणेश मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या परिसरात नागरिकांची ये-जा असते. मात्र त्या ठिकाणी कचर्‍याचा ठिग साचल्याने दुर्गधी पसरत आहे. त्याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
 
- राजकुमार नहार अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर पुणे

Related Articles